रत्नागिरी : पाच दिवसांच्या गणपतींना सोमवारी (१७ सप्टेंबर २०१८) रत्नागिरीत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सायंकाळी मोठ्या मिरवणुका काढून मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी गणपतीबाप्पांचे विसर्जन करण्यात आले. बेंजो, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्ये वाजवून बाप्पांना निरोप देण्यात आला.
गणपतीसह गौरींना ‘पुढल्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करण्यात आले. समुद्रकिनारी भरपूर गर्दी झाली होती. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुपारी तीन वाजल्यापासून मिरवणुकांना सुरुवात झाली. जिल्ह्यात एक लाखाहून अधिक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मांडवी समुद्रकिनाऱ्यावर निर्माल्य संकलनासाठी रत्नागिरी नगरपालिका, मत्स्य महाविद्यालयाचा एनएसएस विभाग, तसेच रोटरी, लायन्स क्लबने मेहनत घेतली. अवयवदान, देहदानासंदर्भातही येथे जनजागृती करण्यात येत होती.
(विसर्जन मिरवणुकीचे व्हिडिओ सोबत देत आहोत.)